अमरावती : केंद्र, राज्यस्तरावर राबविण्यात येत असेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या मिशनचे आदेश ७ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेत धडकले आहेत.अभियानांतर्गत शौचालयांच्या बांधकामासाठी १२ हजार एवढी प्रोत्साहनपर रक्कम ठरविण्यात आली आहे. वैयक्तिक शौचालयाकरिता केंद्राचा वाटा ९ हजार व राज्याचा वाटा ३ हजार रुपये असणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरगुती स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. ही तरतूद होईपर्यंत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतून तूर्तास निधी उपलब्ध करून दिला जाईल. माहिती, शिक्षण व संवाद यासाठी प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या ८ टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यापैकी ३ टक्के निधी केंद्र शासनाकडून व ५ टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)
स्वच्छ भारत मिशनचे आदेश
By admin | Updated: November 9, 2014 22:25 IST