प्राधिकरणच्या उपाययोजना फोल: ७५ हजार कुटुंबांचे आरोग्य धोक्यातवैभव बाबरेकर- अमरावतीपावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून शहरवासियांना जीवन प्राधिकरणच्यावतीने दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असून शुध्द पाणी पुरविण्याचे प्राधिकरणचे सर्व प्रयत्न फोल ठरत असल्याचे चित्र आहे. जीवन प्राधिकरणच्या ७५ हजार नळजोडणीधारकांना ९५ दशलक्ष लीटर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याला मोर्शी तालुुक्यातील सिंभोरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सिंभोऱ्यापासून २२ कि.मी नेरपिंगळाईपर्यंत तर २३ किलोमीटर विद्युत पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटीच्या साह्याने मार्डी रोडस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. याठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन १६ टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. अलिकडे काही काही दिवसांपूर्वी शहरात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढला आहे. पुराचे गढूळ पाणी धरण्यात शिरले आहे. त्यामुळे शहरवासियांना गढूळ पाणी मिळत आहे. एरवी प्राधिकरणकडून पाण्याची योग्य तपासणी केली जाते. मात्र, गढूळ पाण्यात अत्यंत सूक्ष्म जीवंजतू आढळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी शहरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला गेला.
नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: July 26, 2014 23:51 IST