सुनील देशपांडे अचलपूरहिवाळ्याची चाहूल लागताच वीटभट्टीचालकांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. यामुळे वीट तयार करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अचलपूर, परतवाड्यासह ग्रामीण भागातील मंदावलेल्या बांधकामांना गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. रेतीवर बंदी असूनही अवैध मार्गाने घर बांधकामासाठी रेती सहज उपलब्ध होत असल्याने जुळ्या शहरासह तालुक्यात घर बांधकाम बाराही सुरू राहते. मागील काही दिवसांपासून विटांचे भाव कडाडले होते. काही वीटभट्ट्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे घर बांधकामाची प्रक्रिया थंडावली होती. तसेच पावसाळ्यात वीटभट्टी व्यावसायिकांनी वीटभट्ट्या बंद ठेवल्या होत्या. विटा मिळणे कठीण झाले होते. मात्र आता वीट व्यवसायाला सुरूवात झाली असून सापन नदीच्या काठावर वीटभट्ट्या लावल्या जात आहेत. काही भट्ट्या नदीपात्रात तर काही शेतात लावल्या जात आहेत. या वीटभट्ट्यांना लागणारे पाणी शेतातील विहिरीतून पुरविले जाते. पाणी देणारे शेतमालक दरवर्षी हजारो रूपये कमावतात. शेतातील विहिरीतील पाणी देणे हे कायद्यात मोडत नसून अशांवर कारवाई करण्याची मागणी तीन-चार वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते जगतराव पोटे यांनी तहसीलदार आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडे केली होती. वीटभट्ट्या जेमतेम सुरू झाल्या असून त्यांना भाजून तयार करण्यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे सध्या विटा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्याच तर तिला मोठी किंमत मोजावी लागते. यामुळे ग्रामीण भागात सहसा होळीनंतरच बांधकामाला सुरूवात होते. मात्र, मागणीचा विचार करता वीट व्यवसायाला दीड महिना अगोदरच सुरूवात करण्यात आली आहे. काही वीटभट्टीवाले शेतकऱ्यांच्या शेतातील माती चोरून नेत असल्याच्या तक्रारी आहेत. काही वीटभट्टीवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ट्रॅक्टरने शेतातील माती चोरून आणतात. यामुळे सात ते आठ वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. साहेबराव भुस्कुटे यांच्या नदीकाठच्या शेतातील माती चोरून नेताना त्यांनी ट्रॅक्टर रंगेहात पकडले होते. त्यांनी चालकाला हटकले असता त्यांचेवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी हल्ला केला होता. तहसीलदार याबाबत कडक धोरण अवलंबत नसल्याने काही वीटभट्टीचालकांचे फावत आहे.विटा हा बांधकाम साहित्यातील अत्यंक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही दिवसांपासून विटांचे दर प्रचंड वधारले आहेत. त्यामुुळे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय तेजीत असल्याचे दिसते. कोणतेही लहान-मोठे बांधकाम करताना विटांची गरज भासते. दिवाळीनंतर वीटभट्ट्या लावण्यास सुरूवात होते. सध्या वीटभट्टी चालकांनी भट्ट्या लावण्यास सुरूवात केली आहे. अनेकांच्या हाताला त्यामुळे काम मिळाले आहे. अनेकदा नियमांचे उल्लंघन करून लावण्यात येणाऱ्या वीटभट्ट्यांमुळे आसपासच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या बांधकामांच्या अनुषंगाने वीटभट्ट्या लावल्या जातात. यंदा यादृष्टीने विचार केल्यास नियमबाह्य पध्दतीने लावण्यात येणाऱ्या वीटभट्ट्या पर्यावरणास घातक ठरतात. अशा वीटभट्टीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अचलपूर तालुक्यात वीट व्यवसाय तेजीत
By admin | Updated: November 6, 2014 00:50 IST