महापौरपदाची निवडणूक : मार्डीकरांच्या गटनेतेपदामुळे नवे राजकारणअमरावती : चौदाव्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या नेत्यांनी मंथन सुरु केले आहे. राष्ट्रवादी फ्रंटच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर हे कायम असल्याने महापालिकेत नव्या राजकारणाचे संकेत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महापौरपदाच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची आघाडी आहे. काँग्रेसकडे २९ तर राष्ट्रवादी फ्रंट २३ सदस्य संख्येच्या बळावर २०१२ मध्ये सत्तेवर आले. काँग्रेसच्या वाट्याला महापौर आणि राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्यात आले. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिल्याने या उमेदवारीला राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांनी जोरदार विरोध केला. परिणामी खोडके यांना पक्षातून निष्कासित केले गेले. लोकसभा निवडणुकीच्या काळात महापालिकेतील राष्ट्रवादीच्या २३ सदस्यांपैकी ७ सदस्य हे राष्ट्रवादी पक्षासोबत राहिले, तर १७ सदस्य संजय खोडके यांच्याशी प्रामाणिक राहिलेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाने गटनेतापदी सुनील काळे यांची नियुक्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीत गटनेता सुनील काळे की, अविनाश मार्डीकर हा वाद तब्बल पाच महिने राहिला. अखेर दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदी मार्डीकर कायम राहतील, असा निकाल दिला. त्यामुळे २३ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी फ्रंटचे नेतृत्व हे मार्डीकर यांच्या शिरावर असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेत राष्ट्रवादी फ्रंटचे ७ सदस्य संख्या असलेल्या गटाचे नेतृत्व मध्यंतरी राणा यांनी हाती घेतल्याने उच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयाने राजकीय फासे उलटल्याचे हल्ली चित्र आहे. महापौर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निकालाने बरेच राजकीय चित्र पालटले आहे. संजय खोडके यांना बाजूला ठेवून महापौरपदाचा उमेदवार निश्चित करायचा ही पडद्यामागून सुरु झालेली खेळी आता कोणती कलाटणी घेते, हे लवकरच दिसून येईल. महापौरपदाची निवडणूक ही अमरावती व बडनेरा मतदारसंघाच्या अनुषंगाने ठरविली जाणार असल्याची शक्यता आहे. आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके यांच्यात राजकीय ‘अंडरस्टँडींग’ बऱ्यापैकी असून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच मनोमीलन होऊन सत्ता वाटपाचे सूत्रे ठरविली जाणार असल्याची माहिती आ. शेखावत यांच्या निकटवर्तीयांनी दिली. विधानसभा निवडणुकीत कोणतीही राजी-नाराजी न घेता मार्ग सुकर व्हावे, याअनुषंगाने आ. शेखावत यांनी शनिवारी महापालिकेतील काँग्रेस सदस्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. सदस्यांची स्वतंत्रपणे मते जाणून घेताना या निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीचा गोषवारा घेण्याचे रावसाहेब विसरले नाहीत. महापौरपद हे सर्वसंमतीने मित्रपक्षाला देण्याची तयारी काँग्रेसची असून येणारी विधानसभा निवडणूक हेच लक्ष्य असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौरपद हे संजय खोडके यांच्या गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाने महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून तो गट असल्याचा निर्णय दिल्याने राज्याचे नेतेसुद्धा यात हस्तक्षेप करु शकत नाही, असे ‘राज’ कारण निर्माण झाले आहे. दुसरीकडे खोडके यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावरून राजकीय भरारी घेण्याची रणनीती आखायला प्रारंभ केला आहे. आ. शेखावत व खोडके यांचे ‘मिशन विधानसभा’ असल्याने महापौरपदाचा तिढा क्षणात संपेल, अशी खेळी सुरु असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादी फ्रंटमध्ये मंथन
By admin | Updated: August 24, 2014 23:11 IST