मोर्शी : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपप्रणित पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा दावा माजीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. १४ ग्रामपंचायतींमध्ये महाआघाडीतील घटकपक्षांच्या नेतृत्वातील पॅनेलने बाजी मारल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक शुक्रवारी पार पडली. सोमवारी निकाल हाती आले. भाईपूर, येरला, कोळविहीर, खानापूर, रोहनखेड, धामणगाव, सावरखेड, लाडकी, नसिरपूर, डोंगरयावली, निंभी, उदखेड, तरोडा, चिंचोली गवळी, पार्डी, काटपूर, शिरूळ, चिखलसावंगी, दाभेरी, सिंभोरा, नया वाठोडा या ग्रामपंचायतींत भाजपसमर्थित पॅनेलने बाजी मारल्याचे बोलले गेले. अन्य ग्रामपंचायतींत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटनेच्या नेतृत्वातील पॅनेलने यश मिळविल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील सर्वात मोठ्या अंबाडा, नेरपिंगळाई व खेड येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहारचे प्राबल्य दिसून येत आहे. कवठाळ येथे प्रहार संघटनेचे वर्चस्व असून, अंबाडा या गावात प्रहार संघटनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
मोर्शी तालुक्यात भाजपप्रणित पॅनेलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST