फोटो - कडू २९ एस
गावकऱ्यांची आर्जव व्हायरल, मंत्रालयात पोहोचली तक्रार
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील मालूर फॉरेस्ट गावाच्या पुनर्वसनादरम्यान, पुनर्वसित होऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांकडून कोट्यवधी रुपये किमतीच्या सागवान लाकडाची अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वृक्षतोड केली जात असून, ती लाकडे वाहनामध्ये भरून मेळघाट बाहेर आदिवासी नेत आहेत. या अनुषंगाने मालूर ग्रामस्थांनीच एक तक्रार २७ जानेवारीला राज्याच्या वन मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे पाठविली आहे. या तक्रारीवर एकूण १३८ लोकांनी नावापुढे अंगठ्याचे ठसे वा स्वाक्षरी दिली आहे.
प्रकल्प अधिकार्यांपासून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त आणि खोज या संस्थेकडे तक्रार करण्यात आली. खोजने तक्रार ई-मेलवरून २८ जानेवारी रोजी सर्वदूर पाठविली आहे. या तक्रारीसोबत वृक्षतोडीचे छायाचित्रही समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. अवैध वृक्षतोडीचे हे कोट्यवधीचे सागवान हरिसाल-सेमाडोह नाक्यावरून खुलेआम ट्रकमधूनच पाठविले जात आहे. या लाकडाची कुठेही तपासणी होत नाही. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे
---------
मालूर फॉरेस्टचे पुनर्वसन सुरू आहे. गावातील ३१० कुटुंबांपैकी १२५ कुटुंबांचे पुनर्वसन झालेले आहे. यातील काही चांदुर बाजार तालुक्यातील काटपूर व बहीरम परिसरात वास्तव्यास गेले आहेत. पुनर्वसित कुटुंबांकडून अशा प्रकारची कुठलीही अवैध वृक्षतोड केली गेलेली नाही. आर.के. पटवारी, सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग