जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेपाच क्विंटल, नागपूरकरिता साडेबारा क्विंटल निकष, शेतकऱ्यांना जाच
वरूड : राज्य शासनाने २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाने शासकीय तूर खरेदीला मान्यता दिली आहे . मात्र, प्रतिशेतकरी प्रतिहेक्टर जिल्हानिहाय निकष वेगवेगळा आहे. अमरावती जिल्ह्याकरिता प्रतिहेक्टरी पाच क्विंटल, तर नागपूरकरिता १२ क्विंटल ४४ किलोचे प्रमाण दिले आहे. जिल्हानिहाय तफावतीचा तूर उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
राज्य शासनाने २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने तूर खरेदीकरिता १८ डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये मान्यता देण्यात आली. योजनेंतर्गत होणारी तूर खरेदी व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार प्रतिशेतकरी तुरीची खरेदी करण्यात यावी, असा आदेश १४ जानेवारी २०२१ च्या पत्रानुसार आदेश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाने शासकीय तूर खरेदीकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई), दि विदर्भ सहकारी पणन महासंघ (नागपूर) आणि महा एफसीपी (पुणे) यांना आदेश दिले. यामध्ये उत्पादकतेनुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी तूर खरेदीचे निकष लावले आहेत. त्यानुसार, ठाणे ५ क्विंटल ४८ किलो, पालघर ४ क्विंटल ४४ किलो, रायगड ५ क्विंटल ८६ किलो, रत्नागिरी ४ क्विंटल १५ किलो ८० ग्रॅम, सिंधुदुर्ग ४ क्विंटल, नाशिक १२ क्विंटल ९६ किलो २५ ग्रॅम, धुळे ५ क्विंटल ५० किलो, नंदुरबार ५ क्विंटल ५० किलो, जळगाव १२ क्विंटल ३४ किलो, अहमदनगर ९ क्विंटल ५० किलो, पुणे ६ क्विंटल २० किलो, सोलापूर ८ क्विंटल ८९ किलो, सातारा १२ क्विंटल, सांगली ७ क्विंटल ३२ किलो, कोल्हापूर १० क्विंटल ७५ किलो, औरंगाबाद ८ क्विंटल ११ किलो, जालना २० क्विंटल, बीड १५ क्विंटल ७५ किलो, लातूर ६ क्विंटल २० किलो, उस्मानाबाद ६ क्विंटल ८० किलो, नांदेड ८ क्विंटल ५० किलो, परभणी ६ क्विंटल ५० किलो, हिंगोली ८ क्विंटल १५ किलो, बुलढाणा ९ क्विंटल २७ किलो २३ ग्रॅम, अकोला १२ क्विंटल, वाशिम ७ क्विंटल ५० किलो, अमरावती ५ क्विंटल, यवतमाळ ९ क्विंटल, वर्धा ९ क्विंटल आणि नागपूर १२ क्विंटल ४४ किलो असे ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यासाठी जिल्हानिहाय हेक्टरी प्रमाण देऊन शासकीय तूर खरेदीचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, यामुळे या निकषापेक्षा अधिक तूर व्यापाऱ्यांच्या घशात जाईल, तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार हे निश्चित आहे.
दरम्यान, अमरावती वर्धा, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हेक्टरी उत्पादन २० ते ४० क्विंटल असते. परंतु, निकषांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे.