अमरावती : गणरायाचे आगमन झाले आहे. हिदू संस्कृतीतील हे दहा दिवस महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे गणेशाच्या आवडत्या मोदकांप्रमाणेच, मिठाईलाही विशेष मागणी असते. पण, भेसळयुक्त मिठाई बाजारात विक्रीला येण्याची शक्यता असून नागरिकांनी अशा भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहायला हवे.अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध मिठाई व पेढा विक्रे त्यांकडून मिठाईचे नमुने घेतल्यास व ते नमुने जिल्हा आरोग्य तपासणी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविल्यास भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्याचे सत्य बाहेर निघेल. कमी दर्जाचे अन्न पदार्थ विकणे, हे अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा आहे. तसेच भेसळयुक्त मिठाई किंवा मिठाईत विविध प्रकारचे केमिकल्सयुक्त पदार्थ वापरणेही आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक ठरू शकतात. परंतु प्रसादासाठी या दिवसांत नागरिकही महागड्या मिठाई विकत घेतात. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या भेसळयुक्त मिठाई सेवन केल्याने त्याचा परिणाम लहान मुलांच्याही आरोग्यावर होऊ शकतो. अंबानगरीत शेकडो मिठाई विक्रते आहेत. त्यांनी अन्न व प्रशासन विभागाची अधिकृत नोंदणी केली आहे का, त्यांनी तसा परवाना घेतला आहे का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. मागील वर्षी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून मिठाईसाठी येणारा भेसळयुक्त खवा जप्त केला होता. मिठाईत रव्याचाही वापर केला जातो. तसेच शरीराला अत्यंत हानिकारक असलेल्या विविध केमिकलयुक्त कलरचाही यामध्ये वापर केला जातो. नागरिकांनी मिठाई खाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून कमी दर्जाचे मिठाईचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविणे गरजेचे आहे. मात्र, एफडीएचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. (प्रतिनिधी)
सावधान ! भेसळयुक्त मिठाई बाजारात; लाखोंची उलाढाल
By admin | Updated: September 8, 2016 00:23 IST