पान २
चांदूर बाजार : गावखेड्यात पूर्वी उन्हाळ्याच्या वाटेवर हिरव्यागार डहाळ्या व मोहराच्या सुगंधाने आकर्षित करणार्या गावरान अमराया आता दुर्मीळ झाल्या आहेत. संगोपनाऐवजी जुन्या हिरव्यागार आम्रवृक्षांवर कु-हाडीचे घाव बसत असल्याने गावरान आंबा आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड लावणे हे पुण्यकर्म समजले जायचे. आजोबांनी लावलेल्या झाडाचे आंबे नातवाला चाखायला मिळत होते. कारण अडीचशे तीनशे वर्षांपर्यंत आयुष्य असलेले गावरान आम्रवृक्षाला फळे येण्यास तेवढा कालावधी लागायचा. परंतु, काळानुरूप व वातावरणाचा परिणाम वृक्षांवर होत आहे. आताही काही भागात आम्रवृक्षाचे झाड डोळ्याचे पारणे फेडते. मात्र, यावर्षी वातावरणाचा परिणाम आम्रवृक्षवर झालेला दिसत आहे. यंदा अमराईतील आम्रवृक्षाला आलेला कमी बहार त्याची साक्ष देत आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या रसाला मुकावे लागणार की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आयुर्वेदशास्त्रात आम्रवृक्षाचे विविध गुण सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत लग्नकार्य उरकल्यावर नव्या वर-वधूला शेवया व आंब्याचा रस खाण्यास देण्याची परंपरा रूढ आहे. मात्र, आता गावरानी आंबा मिळत नसल्याने तोतापुरी, निलाम अशा आंब्यांची चलती आहे.