टीसी : सहानुभूतीऐवजी अडवणूक अन् दमदाटीअमरावती : नरबळीतून बचावलेल्या अजय वणवेच्या आई किरण यांना आता शंकर महाराज यांच्या ट्रस्टअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विद्यालयातर्फे ‘टार्गेट’ करण्यात येत आहे. नरबळीतून वाचलेल्या मुलांशी आणि नातेवाईकांशी आस्थापूर्वक वागण्याऐवजी आरोपींच्या बचावासाठी कर्मचाऱ्यांनी दंडेली सुरू केल्याचे पुढे आले आहे.प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर आश्रमाच्या हद्दीतच नरबळीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला होता. त्यांना खरे तर ठारच मारावयाचे होते. परंतु काही अनपेक्षित घटना घडल्यामुळे दोघेही बचावले. प्रथमेश मृत्यूशी झुंज देतो आहे. आयसीयूमध्ये तो दाखल आहे. अजय वणवे याच्यावर ३० जुलै रोजी हल्ला झाल्यानंतर अमरावतीत काही दिवस इलाज करण्यात आला. नाक आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला १८ टाके पडले. डोक्यावर जबरदस्त प्रहार करण्यात आल्यामुळे त्याला चक्कर येतात. अजयवर इस्पितळात आवश्यक तो पूर्ण इलाज करण्यात आला नाही. आश्रमातील लोकांनी पैसे न दिल्यामुळे अजयचा इलाज पूर्ण करता आला नाही, असे त्याची आई किरण यांचे म्हणणे आहे. अजय वाचला; पण त्याच्या शरीरात काही बिघाड झाले आहेत. त्याला पाच पाच मिनिटांत चक्कर येतात. डोक्यात शिळका उठतात. तो कायम दहशतीत राहतो. अजयचा बळी दिला जाणार असला तरी तो स्वच्छतागृहात पडल्याचे खोटे कारण शंकर महाराजांच्या आश्रमातून सांगण्यात आले होते. 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे आश्रमाचा खरा चेहरा समोर आला. आता पुन्हा अजयला मृत्यूच्या दाढेत मी पाठविणार नाही, असा निर्धार त्याच्या आईने केला आहे. अजयदेखील आश्रमातील वसतिगृहात राहण्याच्या, शाळेत जाण्याच्या नावाने घाबरतो. काल-परवा अजयच्या आई किरणताई आश्रमात गेल्या होत्या. शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी तेथील शाळेत त्या पोहोचल्या. परंतु शाळेची दमदाटीची आणि अडवणुकीची भूमिका अनुभवल्यानंतर त्या अवाक्च झाल्यात. शाळेतील कर्मचाऱ्याने 'टीसी'च्या मुद्यावरून त्यांना 'ब्लॅकमेल' करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगण्यात आले, तुम्हाला टीसी अशी मिळणार नाही. ती हवी असेल तर पोलिसात आश्रमातील कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल केलेली तक्रार परत घ्यावी लागेल. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे आश्रमातील तीन निर्दोष व्यक्ती विनाकारणच अटकेत आहेत. प्रथमेश सगणेची केस मागे घेण्यात आली आहे. तुम्हीदेखील तुमची केस मागे घ्या. त्यानंतरच टीसी घेऊन जा. शाळा सोडल्याचा दाखला मिळविणे हा प्रत्येकाचा हक्कच आहे. हक्काच्या कामासाठी आश्रमातील शाळेच्या कर्मचाऱ्याने घातलेली अट ऐकल्यावर किरणतार्इंच्या पायाखालची जमीनच सरकली. अटकेत असलेल्या आरोपींना वाचविण्यासाठी आश्रमाच्या हद्दीतून किती निष्ठुरपणे यंत्रणा वापरली जात आहे, याचाच हा पुरावा नाही काय? पोलिसांना आश्रम परिसरातील बेकायदा कृत्यांचे नाना पुरावे सातत्याने उपलब्ध होत आहेत, कारवाई तरीही आश्चर्यकारकरीत्या संथ आहे.
‘नरबळी’च्या गुन्ह्याचे आरोपी वाचविण्यासाठी आश्रम सक्रिय !
By admin | Updated: September 5, 2016 00:11 IST