अमरावती : लग्न समारंभात ५० व०हाडींची मर्यादा ओलांडण्याची मुभा दिल्याबद्दल मंगल कार्यालये, लॉनचालकांवर कारवाईचा धडका महापालिकेने सुरू केला आहे. त्यानुसार गत दोन दिवसांत सिद्धार्थ मंगलमकडून ३० हजार रुपयांचा दंड, तर कल्पदीप मंगल कार्यालयाकडून एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत मर्यादित संख्येचे व गर्दी टाळण्याचे निकष न पाळणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. मर्यादेहून अधिक व्यक्ती असलेल्या समारंभात प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. बडनेरा मार्गावरील लाली लॉन व व्हाईट हाऊस येथेही मोठी गर्दी आढळून आल्याने या लॉनचालकांनाही अडीच लाखांची नोटीस जारी करण्यात आली आहे. रहाटगाव रिंग रोडवरील कल्पदीप मंगल कार्यालयास एक लाखांचा दंड आकारण्यात आला असून, नोटीस बजावण्यात आल्याचे महापालिकेचे बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण यांनी सांगितले.