लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने शासन-प्रशासनाचा जोर लसीकरणावर सर्वाधिक आहे. जिल्ह्यात या मोहिमेला १६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. या कालावधीत ३०.४८ लाख नागरिक लसवंत झाले आहेत, ही ८१ टक्केवारी आहे. आता शत-प्रतिशत लसीकरणासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करचे लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच टप्प्यात अभियान गतिमान झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये गावागावांत शिबिर लावण्यात येऊन लसीकरणाचा टक्का वाढविण्यात आला. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रशांत रोडे व आरोग्य विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी धर्मगुरू, समाजसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांची मदत घेण्यात आली. याशिवाय गावागावांत कल्पकपणे अभियान राबविल्यामुळेच जिल्ह्याचा टक्का वाढलेला आहे. आता बूस्टर डोस देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
१८ वर्षांवरील ८५ टक्के लसवंतजिल्ह्यात १८ वर्षांवरील ८५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये १९,४५,४८३ नागरिकांनी पहिला व १०,९८,३९३ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ४४,८५३, फ्रंट लाईन वर्कर ८६,८२५, १५ ते १८ वयोगटात ५९७७३, १८ ते ४४ वयोगटात १५,१९,९११, ४५ ते ५० वयोगटात ७,५२,५२७ तर ६० वर्षांवरील ५,८४,११२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.