टाकरखेडा संभू : एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण तत्काळ जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील १८ हजार ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आल्यामुळे निवडणूक आयोगाला एप्रिल ते जून २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यभरात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अर्ध्याअधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता मार्च महिन्यात आदर्श आचारसंहितासुद्धा सुरू होणार आहे. परंतु अद्यापही निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे गाव पातळीवर गोंधळाचे वातावरण व राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ग्राम पातळीवरील स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण लवकर जाहीर करावे, अशी मागणी गजानन बोंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (वार्ताहर)
सरपंचपदाचे आरक्षण तत्काळ जाहीर करा
By admin | Updated: February 11, 2015 00:24 IST