विदर्भात नागपूर सर्वात कमी : हुडहुडीमुळे जनजीवन प्रभावितवैभव बाबरेकर - अमरावतीबंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती कायम असून दक्षिण भारतात पाऊस पडत असल्याने थंड वारे वेगाने वाहू लागले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचे तापमान ७.५ अंशांपर्यंत घसरले आहे. १४ वर्षात प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून अतिथंडीमुळे विविध आजार सुध्दा वाढले आहेत. आठवडाभरापासून बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती कायम असल्याने विदर्भात कडाक्याची थंडी वाढली आहे. हिमालयात पश्चिमी विक्षेप सक्रिय असल्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सद्यस्थितीत विदर्भात ढगाळ वातावरणाची सावट असून ३१ डिसेंबरनंतर विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडयात विदर्भातील तापमात चढउतार पाहायला मिळाला असून तापमान १० ते १५ डिग्री सेल्सीअस दरम्यान असल्याचे आढळून आले आहे. मात्र सोमवारी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञ यांनी अमरावतीच्या तापमानाची नोंद घेतली असता चक्क धक्काच बसला. अमरावतीचे तापमान ७.५ डिग्रीपर्यत घसल्याचे नोंद करण्यात आली असून मागील १४ वर्षात प्रथमच डिसेंबर महिन्यातील तापमानाने निच्चांक गाठला आहे. विदर्भातील नागपुर शहरात सोमवारी सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली असून नागपुरचे तापमान ५.४ डिग्री सेल्सीअसपर्यंत उतरले आहे. तापमानाने निच्चांक गाठल्याने विदर्भातील १४ जिल्हातही कडाक्यांची थंडी पडली आहे. दिवसाही थंड वाऱ्यांमुळे अमरावतीकर गारठल्याचे दिसून आले आहे. अतिथंडीमुळे रोगराईत वाढ झाली असून सर्वाधिक त्रास बालकांना आहे.
१४ वर्षात प्रथमच अमरावती @ ७.५
By admin | Updated: December 29, 2014 23:34 IST