शोककळा : पतीचे हृदयविकाराने, तर पत्नीचे आजारपणाने निधनअमरावती : पती-पत्नीचे नातेच जगावेगळे असते. दोन अनोळखी जीव आगळ्या बंधनात अडकतात आणि मग एकमेकांचे सर्वस्व होऊन जातात. आयुष्यभर सुख-दु:खात एकमेकांची सोबत करताना एकाने साथ सोडली की दुसरा सैरभैर होतो. हे दु:ख वर्णनातीत असते. आयुष्यभर अशीच एकमेकांची सोबत केलेल्या जोडप्यातील पतीचे हृदयविकाराने निधन झाले. हा धक्का पचविणे अशक्य झाले आणि अवघ्या चोवीस तासांत त्याच्या अर्धांगिनीने देखील मृत्यूची वाट चोखाळली. स्थानिक संताजीनगर येथील बांबल कुटूंबावर एकामागोमाग एक दोन अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. शिवाय पित्यापाठोपाठ मातेचेही प्राणोत्क्रमण झाल्यानंतर आलेल्या पोरकेपणाची बोचरी जाणिव सोसणेही त्यांच्या वाटेला आहे. संताजी नगरातील अडत व्यवसायी पंजाबराव पांडुरंग बांबल यांचे कुटंूब मूळ भातकुली तालुक्यातील कानफोडी येथील रहिवासी. पुढे ते संताजीनगरातच स्थायीक झाले. या कुटूंबाचे प्रमुख पंजाबराव पांडूरंग बांबल (८४)यांचे हृदयविकाराने शुक्रवारी ७ मे रोजी पहाटे ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शंकरनगरातील हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पितृछत्र हरपल्याने शोकमग्न असलेल्या कुटूंबाला सावरायची संंधी न देताच काही दिवसांपासून आजारी असलेल्या पांडुरंग बांबल यांच्या पत्नी गीताबाई पांडुरंग बांबल (८०) यांनी देखील शनिवारी पहाटे ४ वाजता जगाचा निरोेप घेतला. बांबल कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पतीपाठोपाठ पत्नीचेही प्राणोत्क्रमण!
By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST