जिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समितीचा निर्णयअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती. मात्र या यादीला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून ही यादी रद्द केली. जिल्हा प्रशासनाकडे पाठविला असताना मंगळवारी जलव्यवस्थापन समिती सभेत सदर यादीतील कामावर एक मताने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्हाअधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामे ही विविध यंत्रणाकडे सोपविली होती. यासाठी गावनिहाय काम मंजूर करून कामाची यादी संबंधित विभागाकडे पाठविली. यापैकीच सिंचन विभागाला तलावातील गाळ काढण्यासाठी नऊ कोटींचा निधी कामे पुर्ण करण्यासाठी सोपविली होती. मात्र पदाधिकारी व सदस्यांना विश्र्वासात न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली ही यादी रद्द करण्याचा ठराव जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. मात्र जलयुक्त शिवार हा शासनाचा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी असून ही कामे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या यादीनुसार करू द्यावीत. शेवटी जिल्ह्याचा विकासाचा हा प्रश्न आहे. सोबतच यापुढील जलयुक्त शिवारच्या कामात पदाधिकारी व सदस्य यांच्या सहमतीने सर्क लनिहाय मागवून या कामाची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून यामधील कामे घेण्याबाबत त्यांना विनंती करू, असे मत सभेत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले. यावर सविस्तर चर्चा करून अखेर या कामांना जलव्यवस्थापन समितीने हिरवी झेंडी दाखविली आहे.
अखेर जलयुक्त शिवारची नऊ कोटींची कामे मंजूर
By admin | Updated: October 7, 2015 01:34 IST