कोराना नियमावलींचा विद्यार्थ्यांना वेगळाच अनुभव, जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १८०४ शाळा सुरू
अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून शाळा बंद होत्या. विद्यार्थी घरीच लॉकडाऊन होते. मात्र, तब्बल १० महिन्यांनंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झालेत. जिल्ह्यातील १८०४ शाळांमध्ये पहिल्या दिवशी ५६,७४० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. पुन्हा शाळांमध्ये किलबिलाट अनुभवता आले.
२३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी ऑफलाईन शिक्षणाला पसंती देत आहे. पाचवी ते आठवीचे विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येताच प्रवेशद्धारावर त्यांची थर्मल गनद्धारे तपामान तपासणी, सॅनिटायझर आणि हॅन्डवॉश हा वेगळाच अनुभव त्याच्या वाट्याला आला. एरव्ही मित्रांसोबत मौजमज्जा, गप्पा करीत असताना पहिल्या दिवशी मात्र सहा फुटांचे अंतर ठेवून बोलावे लागले. वर्गातही एकमेकांसोबत बोलण्यास मनाई होती. शिक्षक विद्यार्थी आपसात गर्दी करणार नाही, याकडे लक्ष ठेवून होते. घरी ऑनलाईन शिक्षणाने हैराण झाले असताना शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गातील फळ्यावर खडू उमटल्याचा आनंदही काही औरच होता, असे विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले.
----------------------
पहिल्या दिवशी उपस्थिती
विद्यार्थी - ५६७४०
शिक्षक- ६८७७
शाळा सुरू - १८०४
शिक्षकांची चाचणी- ४७२२
पॉझिटिव्ह- ५५
---------------------
कागदोपत्री शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांविना शाळा हे काही गणित जुळत नव्हते. शिक्षकांना अध्यापनाशिवाय करमत नाही. पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत येताच त्या्चे पुष्पगुच्छाने स्वागत केले. १० महिन्यांनंतर फळ्यावर खडू चालविला आणि शिक्षक पेशाचा आनंद द्धिगुणित झाला.
- सिद्धी मनीयार, शिक्षिका, अमरावती
----------------------
गाव, खेड्यात कोरोनाचे भय नाही.शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेची ओढ दिसून आली. ६ ते ७ या तीन वर्गात ३८ पटसंख्या आहे. त्यापैही पहिल्या दिवशी २२ विद्यार्थ्याची उपस्थिती होती. उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. पुढेही गर्दी वाढतच जाणार आहे. पालकांची संमती आहे.
वनिता जावरकर, शिक्षिका, नांदुरा
---------------------------
घरी राहून त्रस्त झाली होती. शाळा कधी सुरू होणार याची आतुरतेने प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी ती पूर्ण झाली. १० महिन्यांपासून वर्गमित्र दिसले नव्हते. मात्र, आता त्यांच्याशी बोलता येते. सहा फुटांचे अंतर ठेवून संवाद साधता आला. अभ्यासाची गोडी निर्मण होत आहे.
- शुभांगी माळी, विद्यार्थिंनी
----------------------
ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र, वर्गात शिक्षण घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आता ऑफलाईन शिक्षणातून गणित, विज्ञान व इंग्रजीचे धडे गिरवता येत आहे. शिक्षकांना अडीअडचणी विचारता येतात. अध्ययन सुकर झाले आहे. जुन्या मित्रांना भेटता येते.
- कृष्णा पाटील, विद्यार्थी.