टोळी सक्रिय : पोलिसात तक्रार, लाखोंची लुबाडणूकनरेंद्र जावरे अचलपूर सुशिक्षित बेरोजगारांना हेरून नोकरीचे आमिष देत त्यांना लाखो रूपयांचा गंडा घालणारी टोळी परतवाडा शहरात सक्रिय झाली आहे. यासंदर्भात परतवाडा पोलिसात तक्रार दाखल झाली असून जवळपास पंधरा युवक या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राजेंद्र रामकृष्ण नेमाडे (३६, रा. धामणगाव गढी) असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव असून नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा तो सचिव असल्याचे परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. संगीता सतीश अग्रवाल (३८, रा. देवमाळी) या महिलेच्या तेजस नामक मुलास शासनांतर्गत असलेल्या योजनासंदर्भात आपल्या संस्थेत नोकरी लावून देत असल्याची बतावणी करून २ लक्ष ७० हजार रूपयांनी फसवणूक व रक्कम परत मागितली असता अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद परतवाडा पोलिसात केली आहे. फिर्यादी महिला परतवाडा येथे शिवणक्लास चालविते. उपरोक्त संस्थेचा सचिव राजेंद्र नेमाडे हा नोव्हेंबर २०१३ मध्ये आपल्या घरी आला होता. त्याने आपणास संस्थेला मिळालेल्या शासकीय अनुदानाबाबत बनावट कागदपत्रे दाखविली व माझ्या मुलास संस्थेमध्ये कॉम्प्युटर आॅपरेटर पदावर नोकरी लावून देण्यासाठी दरमहा पंधरा हजार रूपये वेतन देण्याचे सांगितले. त्याच्या आश्वासनानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून २ लक्ष ७० हजार रूपयांची मागणी केल्यामुळे मी धनादेश दिला. सदर धनादेश त्यांच्या बँक खात्यामधून वळविला. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी राजेंद्र नेमाडे याने संस्थेच्या नेमणुकीचे आज्ञापत्र दिले. तीन महिन्यांत रुजू करण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता वारंवार दोन ते तीन महिन्यात रुजू करून घेतो, असे वारंवार सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात रुजू करून घेतले नाही. त्यामुळे तक्रार दाखल केली.शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकीराजेंद्र नेमाडे हा १२ मे २०१५ रोजी आपल्या घरी तीन ते चार इसमांना घेऊन आला व त्याला मुलगा तेजसच्या नोकरीसंदर्भात विचारणा केली असता त्याने आपणास अश्लील शिवीगाळ व पैसे परत न करण्याची धमकी दिल्याचे संगीता अग्रवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. जास्त तगादा लावल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजेंद्र नेमाडेवर कारवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तेजस पहिला बळी!संस्थेत नोकरीचे आमिष देवून फसवणूक झालेला तेजस अग्रवाल हा पहिला बळी पुढे आला आहे. त्याची आई संगीता अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दिली तर शहरात अजूनही सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांच्याकडूनसुद्धा लाखो रूपयांची लुबाडणूक झाल्याचा संशय असून त्यांनी पुढे येण्याचे आवाहन अग्रवाल कुटुंबीयांनी केले आहे. परतवाडा पोलिसांनी तक्रार घेऊन चौकशीला प्रारंभ केला आहे. यात किती युवकांची फसवणूक झाली हे पुढे येणार आहे.
परतवाड्यात बेरोजगारांना फसविणारी टोळी सक्रिय
By admin | Updated: May 19, 2015 00:12 IST