व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवस, मेळघाट अंगारमुक्त जंगलाविषयी प्रबोधन
नरेंद्र जावरे
परतवाडा : मेळघाटातील जंगलात दरवर्षी पेटणारा वनवणवा. त्यामुळे होणारी कोट्यवधी रुपयांची हानी, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तृणभक्षी मांसभक्षी व वन्यप्राण्यांचा होरपळून होणारे मृत्यू यावर माहिती देत आदिवासींमध्ये जनजागृतीसाठी सात समन्वयक सरसावले आहेत. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या जागरादरम्यान ते ३०० गावांना भेटी देत एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतील. शंभर गावांत ते मुक्कामी असतील.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापना दिवसानिमित्त अंगार मुक्त जंगल स्पर्धा व जनजागृती अभियानाला सुरूवात करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोना कालावधीत लॉकडाऊनचे नियम पाळून या गावसभा घेतल्या जाणार आहेत. मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयुषा जगताप, सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश व मेळघाट प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक गिनी सिंग यांनी हिरवी झेंडी दिली. २२ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत ही पर्यावरण व वन्यप्राणी सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
बॉक्स
मेळघाट, अकोट, अंजनगाव पाड्यात जनजागृती
१ हजार किलोमीटरच्या या मोहिमेचे कार्यक्रम समन्वयक धनंजय सायरे हे असून, सिपना वन्यजीव क्षेत्र समन्वयक पंढरी हेकडे, अकोट वन्यजीव विभाग नागोराव सोलकर, गुगामाल वन्यजीव विभाग सुरेश सावलकर, मेळघाट प्रादेशिक विभाग पथकाचे संतोष शनवारे, घटांग जारिदा विभाग नागेश धोत्रे, अंजनगाव टेंब्रुसोडा विभाग सुरेंद्र भास्कर आदी यात सहभागी आहेत. हे पथक मेळघाट, अकोट व अंजनगाव तालुक्यातील पाड्यांमध्ये पोहोचणार आहे.
होळीच्या पार्श्वभुमिवर स्पर्धा
मेळघाटात होळीचा सण फार महत्त्वाचा आहे. २५ मार्चपासून मेळघाटमध्ये पारंपरिक गाव पंचायत सुरू होतील. त्या आधी अंगारमुक्त जंगल स्पर्धेदरम्यान करावयच्या कामाची चर्चा आणि त्याला दिलेले गुण या विषयी गावागावात माहिती देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि जंगल अंगारमुक्त ठेवणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.