संजय खासबागे - वरूडतीन वर्षांपासून वरुड तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट तसेच कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. नैराश्यामुळे मागील ७ महिन्यांत तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीरवून स्पष्ट झाले आहे.सन २०१०पासून सतत सुरू असलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांची अवस्था विदारक झाली व शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून दुबार, तिबार पेरणी करुनही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय पूर्णत: डबघाईस आला आहे. बदलत्या वातावरणामनुळे उत्पादनात कमालीची घट झाली. तरीही शेतकऱ्यांनी पर्याय व्यवसाय नसल्यामुळे शेती व्यवसाय सुरुच ठेवला. परंतु उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. १४ एप्रिल ते ६ आॅक्टोबर २०१४ पर्यंत तब्बल १७ शेतकऱ्यांनी या कारणांमुळे आपली जीवनयात्रा संपविली. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पिके बुडाली. यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुला-मुलींची लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांच्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
वरुडमध्ये १७ शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Updated: December 13, 2014 22:31 IST