वनविभाग : १ एप्रिलपासून मिळणार लाभअमरावती : वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील १०० वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे व फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रवासभत्ता लागू करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असावयास पाहिजे व त्या वनक्षेत्रात घट येऊ नये, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिले जात आहे. जिल्ह्यातील वनराईचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविली आहे. वनांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी याच अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे आहे. यासाठी यांना वनांच्या गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. याचा परिणाम गस्तीवर होत असतो. गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी अनेक संघटनांनी शासनाकडे लावून धरली. या मागणीची शासनाने दखल घेवून फेब्रुवारी २ ०१६ या महिन्यापासून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिमाह १,५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता
By admin | Updated: February 6, 2016 00:18 IST