सचिन राऊत / अकोलामहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कंपनीकडून शेतकर्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्यानंतर, त्यांना नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेल्या ७0 लाख रुपयांच्या रकमेमध्ये हेराफेरी करणार्या महाबीजच्याच क्षेत्र अधिकार्यानंतर आता महाबीजच्या काहीअधिकार्यांसह आणखी दोन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईचा फास आवळल्या जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रभाकर तराळे नामक लिपिकास अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.महाबीजकडून गतवर्षी राज्यातील हजारो शेतकर्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. यामध्ये राज्यातील २८६ शेतकर्यांनी महाबीजकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे केवळ ५ ते १0 टक्केच उगवल्याने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील विविध भागाच्या शेतकर्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी महाबीजकडे केल्या होत्या. यावरून महाबीजच्या अधिकार्यांसोबतच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनीही या शेतीची पाहणी करून उगवणक्षमता योग्य असताना ८0 ते ९0 टक्के बियाणे न उगवल्याचा अहवाल दिला होता. या अहवालानंतर महाबीजने राज्यातील २८६ शेतकर्यांना ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामधील ६३ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली असून, यामध्ये मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्षेत्र अधिकारी दिलीप नानासाहेब देशमुख याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर महाबीज कर्मचारी पतसंस्थेचा लिपिक प्रभाकर तराळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यानंतर आता कृषी विभागाचे अधिकारी, पीकेव्ही व महाबीजच्या अधिकार्यांवर संशयाची सुई गेल्याने त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.अशी केली हेराफेरीबियाणे न उगवल्याची तक्रार महाबीजकडे केल्यानंतर महाबीजकडून ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. ती रक्कम सहाय्यक क्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्याकडे देऊन सदर नुकसानभरपाई शेतकर्यांना देण्याचे आदेश दिले; मात्र देशमुख याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्यांना न देता ती परस्पर कर्मचारी पतसंस्थेच्या खात्यात जमा केली. ज्या पतसंस्थेचे ते सचिव आहेत, त्याच पतसंस्थेच्या खात्यात ही रक्कम जमा करून फसवणूक करण्यात आली आहे.
दोन विभागांचे अधिकारी रडारवर!
By admin | Updated: March 24, 2016 02:21 IST