प्रवीण खेते/ अकोला : ऐरव्ही शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो; परंतु यंदा शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा शिक्षक कल्याण निधी गोळा करण्यावर भर दिला असून, हा निधी उभारण्याचा भार विद्यार्थ्यांच्याच खांद्यावर टाकला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच प्रशिक्षण विद्यालयांमध्ये ५ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून राष्ट्रीय शिक्षक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांना संस्कार देऊन, भविष्यातील चांगले नागरिक घडवितात. असे असले तरी, विद्यार्थ्यांना घडविण्यापेक्षा इतर शासकीय उपक्रमांची जबाबदारीच शिक्षकांवर जास्त असते. त्यामुळे विद्यार्थी संस्कारापासून दुरावला असून, शिक्षक वर्गदेखील खचला आहे. शिक्षकांची स्थिती सुधारावी यासाठी शासनामार्फत विशेष निधी उभारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतात. यंदा हा निधी उभारण्यासाठी शासनाने शिक्षक दिनाचा मुहूर्त काढला असून, त्याचा भार विद्यार्थ्यांच्या खांद्यावर सोपविला आहे. शिक्षक कल्याण निधीच्या अनुषंगाने कागदी बिल्लयांची छपाई करण्यात आली आहे. हे बिल्ले शिक्षक दिनी ५ रुपयांप्रमाणे राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विकले जाणार आहेत. बिल्लय़ांची विक्री करताना विद्यार्थी किंवा शिक्षकांवर कागदोपत्री सक्ती करण्यात येणार नसली तरी, गुरूजींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांना झटावे लागणार, हे निश्चितच आहे.
*असा उभारणार निधी
शिक्षक दिनानिमित्त राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षक कल्याण निधी उभारण्यात येणार आहे. याशिवाय, शिक्षक दिनानिमित्त आयोजित खेळांचे सामने, योग वर्ग, लेझीम, दांडपट्टे, कसरतीचे कार्यक्रम, कुस्ती आदी उपक्रमांच्या माध्यमातून आलेल्या उत्पन्नाचा काही हिस्सादेखील शिक्षक कल्याण निधीमध्ये वळता करण्यात येणार आहे.