संतोष येलकर / अकोलाया वर्षीच्या खरीप हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १६ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीसाठी १२ लाख क्विंटल बियाण्याची मागणी आहे; मात्र मागणीच्या तुलनेत आतापर्यंत विभागात केवळ ५ लाख १0 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मागणीपेक्षा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे.लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर, या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने शेतकर्यांनी तयारी सुरू केली असून, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांची खरेदी सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर अमरावती विभागात १६ हेक्टरवर सोयाबीन पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी १२ लाख क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाकडून महाबीजसह विविध कंपन्यांकडे करण्यात आली आहे. मात्र अतवृष्टी आणि गारपिटीमुळे कापणी हंगामात सोयाबीनचे पुरेसे बियाणे तयार करता आले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत आहे. परिणामी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची एकूण मागणी १२ लाख क्विंटल असली तरी, प्रत्यक्षात आतापर्यंत (६ जून) केवळ ५ लाख १0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. मागणीच्या तुलनेत सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर, यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मागणीपेक्षा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी
By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST