अकोला : सतत तीन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने यावर्षीही बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेकडो शेतकरी दरवर्षी घरचे बियाणे वापरतात; पंरतु यावर्षी शेतकर्यांकडे सोयाबीनच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सोयाबीनचे बियाणे कमी पडू नये, यासाठी तयारी सुरू केली आहे. गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला आहे. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकर्यांना संघर्ष करावा लागला. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. तरीही उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, यावर्षी तर बियाण्यांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत असताना, खासगी बाजारात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल २५00 ते २९00 च्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगांची वाढ खुंटली होती. हाच धागा धरू न शेतकर्यांच्या सोयाबीनची बाजारात लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. सतत दोन वर्षांच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकरी शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विकायला आणत आहेत. हमीभावाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे प्रतिक्विंटल हमीदर २५६0 वर स्थिरावले आहेत. त्याचा फटका शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
यावर्षीही जाणवणार सोयाबीनचा तुटवडा !
By admin | Updated: March 15, 2016 02:11 IST