नगदी पीक म्हणून पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते; परंतु काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोंड अळी पिकाचे मोठे नुकसान करत असल्याने उत्पादनात घट होत आहे. लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या कापूस पिकातून केवळ लागवड खर्च निघू लागला आहे. पश्चिम विदर्भात गुलाबी बोंड अळीचा सर्वाधिक प्रकोप खरीप २०१७ मध्ये झाला होता. २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. मध्यंतरी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने कपाशीवर बोंडसडचा जास्त प्रादुर्भाव झाला. या नुकसानीचा पीकविमाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा उपद्रव होऊ नये, याकरिता कृषी विभागाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.
--बॉक्स--
काय म्हणतात शास्त्रज्ञ
कापूस शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास प्रादुर्भाव वाढतो. कपाशीची हंगामपूर्व पेरणी झाल्यास बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होणार नाही. याउलट पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक प्रभावी उपाययोजना म्हणून यंदा हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणेच उपलब्ध होऊ न दिल्यास हंगामपूर्व लागवड टाळता येऊ शकते. त्यामुळेच १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.
--बॉक्स--
सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई
या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियमात २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
--पाॅइंटर--
बियाणे पुरवठा करण्याबाबत असे आहेत निर्देश
उत्पादक ते कंपनी वितरक : १० मे पासून पुढे
वितरक ते किरकोळ विक्रेता : १५ मे पासून पुढे
किरकोळ विक्रेता ते शेतकरी : १ जूनपासून पुढे
--बॉक्स--
१ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ४७ हजार हेक्टरमध्ये कपाशी लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये हंगामपूर्व लागवड होणार नसल्याची खबरदारी घेतली जात आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी १ जूननंतर पेरणीच्या तयारीत आहेत.
--बॉक्स--
यंदा ३,६७५ क्विंटल बियाणांची मागणी
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात १ लाख ६८ हजार १५८.२ क्विंटल बियाणांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये कपाशीच्या ३ हजार ६७५ क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे. सरासरीपेक्षा पेरणी क्षेत्रातही वाढ होणार आहे.