बुलडाणा : जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ८0२ जागांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना तहसील कार्यालयावर अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. जिल्ह्यात एकूण १४ हजार ३४७ अर्ज दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. सर्वसाधारण निवडणुकीसोबतच पोटनिवडणूकही होत असल्याने या जागांवरही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
*निवडणूकआयोगाने वेळ वाढवून दिला
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन अर्ज दाखल होत असल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. रिमझिम पाऊस, इंटरनेटच्या कनेक्टीव्हीटीचा प्रश्न यामुळे उमेदवारांचा वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी जीव टांगणीला लागला होता. सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड उडाली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगामार्फत उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी एक तासाचा वेळ वाढवून देण्यात आला. अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला. चिखलीमध्ये रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती तहसीलच्या सूत्रांनी १७५0 अर्ज दाखल झाल्याचे सांगितले; मात्र अधिकृत अर्जाचा आकडा वृत्त लिहेपर्यंत मिळाला नाही.
*ऑफलाईन अर्जही स्वीकारले !
निवडणूक आयोगाने एक तासाची वेळ वाढवून दिली; मात्र ऑनलाइनचा घोळ मिटता मिटत नसल्याने शेवटच्या एक तासात लोणार तहसील कार्यालयात ऑफलाइन अर्जही स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना अल्प प्रतिसाद दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणुका अविरोध करण्याचा प्रयत्न जोरकसपणे झाला नाही तळणी, वरूड, सिंदखेड मातला, कंडारी, भंडारी शिवाजीनगर व पांगरखेड, नांदुरामधील रसुलपूर या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.
*अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी
अनेक ग्रामपंचायतमध्ये निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले;मात्र अंतिम क्षणी काही इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केल्याने अशा इच्छुकांची गावातील नेते मनधरणी करताना दिसत होते.