अकोला : वीज जोडणीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना तातडीने वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.शेतात वीज जोडणीसाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरले आहे; मात्र अद्यापपर्यंत महावितरण कंपनीमार्फत संबंधित शेतकर्यांना वीज जोडणी देण्यात आली नाही. कर्ज काढून शेतकर्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरले; परंतु अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याने, शेतकर्यांचे नुकसान होत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे कोटेशन भरलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात तातडीने वीज देण्यात यावी, या मागणीसाठी भाजयुमोच्यावतीने शेतकर्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, प्रदेश सदस्य हरीश अमानकर, उमेश जाधव, जिल्हा सरचिटणीस दिलीप सागळे, सचिन गोतमारे, डॉ.संजय शर्मा, संतोष चांडक, प्रमोद रोकडे, विशाल भुजबले, ज्ञानेश्वर पोटे, सुनील थोरात, जयंता पोटे, प्रवीण राजनकर, योगेश पटोकार, मंगेश गाडगे, राहुल वानखडे, सतीश धुमाळे, गोपाल काकड, सतीश जैस्वाल इत्यादी शेतकरी सहभागी झाले आहेत. वीज जोडणी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
शेतकर्यांना वीज जोडणी द्या!
By admin | Updated: May 29, 2014 23:25 IST