अकोला: शेतातील सोयाबीनचे पीक करपल्यामुळे शेतकर्यावर व त्याच्या कुटुंबावर सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आली असून, शेतकरी व त्याच्या कुटुंबाने करपलेल्या पिकाची पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. युवा शेतकर्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठविलेल्या पत्रातून मदतीची याचना केली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील युवा शेतकरी महेंद्र सहदेवराव वासनिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते उच्चशिक्षित आहेत. त्याच्याकडे दोन हेक्टर कोरडवाहू शेती असून, त्यांच्या कुटुंबामध्ये वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुली आहेत. महेंद्र यांनी दोन वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी केली. परंतु महाविद्यालयात डोनेशनसाठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने, त्यांना नोकरी सोडावी लागली आणि बेरोजगार व्हावे लागले. नोकरी गेल्याचे दु:ख सावरून ते शेती करायला लागले. परंतु शेतीही पिकत नसल्याने, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यंदा सोयाबीनची लागवड केली. परंतु सोयाबीन करपल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. तुरीची लागवड केली. उसनवारी करून शेतीला पैसा लावला. त्यात आईच्या आजारपणाचा खर्च, मुलींचे शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न महेंद्रसमोर उभा राहिला. या प्रकारामुळे खचलेल्या महेंद्रने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. शासनाने पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतरच आर्थिक मदत करावी, असे पत्रात महेंद्रने नमूद केले आहे.
महेंद्रची देवेंद्रला मदतीची साद
By admin | Updated: October 30, 2015 01:33 IST