अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील तेच प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने यावेळी समोर असले तरी यावेळची निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांकडून होत आहे. भारिप-बमसंऐवजी वंचित बहुजन आघाडी या नावाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविल्यामुळे ओबीसींमधील सर्व घटकांमध्ये पक्षाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे यावेळचा निकाल वेगळा असेल, असा विजयी विश्वास या पक्षाच्या समर्थकांना आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या गेल्या तीन निवडणुकींचा मागोवा घेतला तर अॅड. आंबेडकरांना मिळालेली मते ही चढत्या क्रमाने आहेत तर काँगे्रसच्या मतांमध्ये विभाजन झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्यास मुस्लीम मते आंबेडकरांकडे वळतात हे हेरूनच काँग्रेसने २०१४ मध्ये हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अॅड. आंबेडकरांकडे वळलेल्या मुस्लीम मतांना बे्रक बसला व काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. नेमकी हीच खेळी काँग्रेसने यावेळी खेळल्याने वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला; मात्र झालेले मतदान पाहता वंचित बहुजन आघाडीच्या गोटात आपण कोंडी फोडण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. ओसरलेली मोदी लाट, विद्यमान खासदारांच्या विरोधात असलेली सुप्त नाराजीची लाट अन् ओबींसीसह सर्वच लहान-मोठ्या समाजापर्यंत पोहोचत बाळासाहेबांनी वाढविलेली ताकद या बळावर सध्या विजयाचे सूत्र पक्षात मांडले जात आहे. .मोदी लाट, ओबीसींची बांधलेली मोट व अॅड. बाळासाहेबांना राज्यभरात मिळालेले समर्थन या आधारावर आम्ही विजयाचे सूत्र मांडत आहोत- प्रदीप वानखडेजिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी