अकोला : बाश्रीटाकळी गावानजीक मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडल्याने मागील नऊ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता. व्हॉल्व दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी जलप्रदाय विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली असून, मुख्य मार्गांवर पाण्याचे अक्षरश: लोट वाहत आहेत. मनपाच्या लेखी पाण्याची किंमत शून्य असल्याने की काय, आम आदमी पक्षाच्यावतीने मंगळवारी पाणी असलेल्या रस्त्यांवर ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीनंतर अकोला शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यादरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये जलवाहिन्यांना गळती लागून त्यामधून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. यासंदर्भातील सचित्र वृत्त लोकमतमध्ये उमटल्यानंतर देखील मनपाची प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अकोलेकरांना दहा दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याने काही काळासाठी का होईना, पाण्याची नासाडी सहन करावी लागेल, असा अनाहूत सल्ला प्रशासनातील जबाबदार अधिकार्यांकडून मिळत आहे. महान धरणातील अत्यल्प जलसाठा व उन्हाळ्य़ातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाण्याची काटकसर करण्याची नितांत आवश्यकता आहे. नागरिकांना पाणी मिळत असल्याने सत्ताधार्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीसुद्धा नासाडीकडे दुर्लक्ष केले. अशोक वाटिका चौकात जलवाहिनीसह व्हॉल्व्हला गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळेच पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवारी दुपारी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. गळती त्वरित दुरुस्त न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट; ‘आप’चा रस्त्यावर ठिय्या
By admin | Updated: February 18, 2015 02:09 IST