सावरगाव, ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण प्रभार दिला नाही, तसेच ते झरंडी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असून, ग्रामपंचायतला पाणी फाउंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांच्या पारितोषिक धनादेशाच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारचे कामे न करता सदर रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. सावरगाव, येथील ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये सचिव शिवकुमार सरजे व सरपंच गजानन बलक यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असून, काही कामे अर्धवट असूनसुद्धा त्याचे देयक काढण्यात आले. काही कामे कागदोपत्री दाखवून निधीचा अपहार करण्यात आला. त्यामुळे मोका पाहणी करून ग्रामपंचायतची संपूर्ण खातेनिहाय चौकशी करण्याचे निवेदनात म्हटले आहे, तसेच सावरगाव येथे जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झालेल्या दहा लाखांच्या बंजारा समाजाच्या सभागृहाच्या बांधकामामध्ये जुन्या विटा व निकृष्ट साहित्य वापरण्यात आले आहे. त्यामुळे सदर निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी करून कंत्राटदार व स्थानिक प्रशासनावर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. १५ दिवसांच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहन करण्याचा इशारा विजयकुमार बळीराम ताले यांनी दिला आहे.
तक्रारीबाबत वरिष्ठांकडून मला पत्र मिळाले नाही, तसेच वरिष्ठांकडून चौकशी झाल्यानंतरच अपहार झाला किंवा नाही, हे समोर येईल.
-शिवकुमार सर्जे, सचिव सावरगाव