विवेक चांदूरकर / अकोला : राज्यात कृषिपंप जोडणीचे १ लाख ६0 हजार शेतकर्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुट्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, शासनाकडे फंड नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नाही आहे. एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्यावतीने पिटण्यात येत असून, विहिरीत पाणी असल्यावरही शेतकर्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणल्या जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी शेतात कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. त्यांना विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व शेतकर्यांना फायदा होईल. मात्र, शासनाच्यावतीने शेतकर्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वषार्ंपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकर्यांनी अर्ज सादर करून जोडणी मिळण्यासाठी आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. मात्र, अशा १ लाख ६0 हजार शेतकर्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण मात्र आपल्या कामाची वाहवा करीत असून, २00५ साली राज्यात ९ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते, त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. शेतकर्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्यावरही केवळ शासनाकडे फंड नसल्यामुळे त्यांना जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. तीन ते चार वर्षे शेतात पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतकर्यांच्या या दुर्दशेला केवळ शासनच जबाबदार आहे.
राज्यात दीड लाख कृषी जोडण्या प्रलंबित
By admin | Updated: May 25, 2015 02:17 IST