मयूर गोलेच्छा / लोणार (बुलडाणा) लोणार सरोवर परिसरात असलेल्या मंदिरातील गोमुखातून बाराही महिने पडणार्या पाण्याच्या धारेचा प्रवाह पन्नास वर्षानंतर प्रथमच कमी झाला आहे. त्यामुळे सन १९७२ च्या दुष्काळाची परिस्थिती आज उद्भवल्याचे अधोरेखित होत आहे.तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावून जल दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. कितीही मोठा दुष्काळ असला तरी लोणार सरोवर परिसरात असलेल्या मंदिरात गोमुखातील पाण्याच्या धारेचा प्रवाह १९७२ चा दुष्काळ वगळता कधीही कमी झाला नव्हता. पूर्वी दोन फूट असलेली ही धार आज मात्र जवळपास दोन इंचाची झाली आहे. गोमुखातून उंचावरून पडणार्या जवळपास दोन फुटांच्या धारेमुळे परिसरा तील नागरिक उन्हाळ्यात येथे पिण्याचे पाणी भरण्यासाठी तसेच आंघोळीकरिता सकाळी ५ वाजेपासून मोठय़ा प्रमाणावर गर्दी करतात. परिणामी, कधीही पाणीटंचाईची जाणिव नागरिकांना झाली नाही. १९७२ मध्ये जेव्हा धारेचा प्रवाह कमी झाला होता तेव्हा ग्रामस्थांनी गोमुखाला वडाचे पान लावून पाण्याची व्यवस्था केली होती, असे वयोवृद्धांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
गोमुखातील धार झाली कमी!
By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST