नीलेश शहाकार/बुलडाणा : दोन वर्षांपासून पडणार्या अल्प पावसामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले असून, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. त्याअनुषंगाने वन्यप्राण्यांना जंगलात पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी महसूल व वनविभागाच्या योजनेअंतर्गंत १९६ वनतळे आणि बंधार्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राज्यातील १७ वन्यविभागांमध्ये येणार्या ५९ वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना जंगलात सहज पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनतळे, वनबंधारे, पाणी साठवणारे बंधारे बांधण्यात येणार असून, यासाठी ५८४.६९ लक्ष रुपयांचा निधी देण्याचा निर्णय वनविभागाने ७ जुलै रोजी घेतला. नुकताच संपलेला उन्हाळा व त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जंगलातील नाले, छोटेमोठे पाणी साठवून राहणार्या पाणथळीच्या जागा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांना तहान भागविण्याची कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी नव्याने बांधण्यात येणार्या वनतळे, वनबंधारे, तसेच सिमेंट बंधार्यांचा फायदा पुढच्या वर्षी वन्यजिवांना होणार आहे. *१७ वनविभागांचा समावेश औरंगाबाद वनवृत्तातील बीड, परळी, पाटोदा आणि धारुर, नागपुर वनवृत्तातील नागपूर, वर्धा आणि गोंदिया, धुळे वनवृत्तातील धुळे आणि जळगाव, यवतमाळ वनवृत्तातील यवतमाळ आणि पांढरकवडा, अमरावतीमधील पश्चिम मेळघाट, अमरावती आणि बुलडाणा, कोल्हापूर वनवृत्तातील सांगली, खानापूर आणि आटपाडी, तसेच गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली, घोट, मार्कंडा, चार्मोशी, पिरमिली, भामराड, एटापल्ली, कसनसूर, गट्ट, ताडगाव, सिरोंचा, असरअल्ली, गडचिरोली, उ.धानोरा, वडसा, देलनवाडी, कुरखेडा, पुराडा, बेडगाव, पोर्ला, आरमोरी आदी वनक्षेत्राचा या योजनेत समावेश आहे.
वन्यप्राण्यांना पाणी मिळण्यासाठी बांधणार वनतळे
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST