शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ डिसेंबरपासून वेगळ्या विदर्भासाठी अंतिम टप्प्याची लढाई सुरू होणार आहे. हे महाराष्ट्र विधानसभेचे राज्यातील अंतिम हिवाळी अधिवेशन असेल, यानंतर वेगळ्या विदर्भाचेच अधिवेशन नागपुरात होईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, की अनुशेष, कुपोषण, नक्षलवाद याचे एकच उत्तर वेगळा विदर्भ हे आहे. विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री असतानाही विदर्भावरील अन्यायाने कळस गाठला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विदर्भ विकासाचे आश्वासन देणार्यांच्या राजवटीतच विदर्भाचा अनुशेष कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे दिसत आहे. यासाठी आता आर-पारची लढाई करावी लागणार आहे. विदर्भात शेतकर्यांच्या आत्महत्या, मेळघाटातील कुपोषण आणि नक्षलवाद या तीन प्रमुख समस्या आहेत, विदर्भाचे वेगळे राज्य झाल्याशिवाय या समस्या सुटू शकणार नाहीत, छोट्या राज्यांमुळे देशाचे नुकसान नाही, तर फायदाच होतो. छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या सोयीची असतात. यासाठी विदर्भ राज्याच्या दुसर्या विधानसभेचे प्रतिअधिवेशन डिसेंबरमध्ये नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. याप्रसंगी डॉ. श्रीनिवास खांदेवाले वेगळ्या विदर्भाच्या विकासाचे प्रारुप मांडणार असल्याची माहिती अँड. वामनराव चटप यांनी दिली. अकराही जिल्ह्यातील ८५ तालुक्यांमधून वेगळ्या विदर्भाचा जागर करणार आहेत. यात एकूण २५ हजार लोक सहभागी होणार आहेत. या पाचही ठिकाणावरून निघणार्या दिंड्या नागपुरात होणार्या हिवाळी अधिवेशनात धडकणार असल्याचे यांनी सांगितले. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांकडून आम्हाला अपेक्षा होत्या. पण, भाजपाने आमच्या अपेक्षांची पूर्तता केलेली नाही. तसेच त्याची किंमत भाजपाला पुढल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल. ३१ डिसेंबरपर्यंंत वेगळा विदर्भ झाला नाही, तर १ जानेवारीपासून हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याची माहितीही दिली.
५ डिसेंबरपासून वेगळय़ा विदर्भासाठी अंतिम लढाई- चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 01:52 IST