अतुल जयस्वाल /अकोला: गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यासह जिल्हय़ातील बळीराजा हतबल झाला आहे. सततची नापिकी व डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून, जिल्हय़ात गत महिनाभरात तब्बल १६ शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव या महिनाभरात समोर आले आहे. जिल्हय़ातील शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जिल्हय़ात सिंचनाचा मोठा अनुशेष असल्याने शेतकर्यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्यांना मोठाच फटका बसला आहे. जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. वर्ष २0१२-१३ व २0१४-१५ मध्ये अतवृष्टीमुळे शेतकर्यांना चांगलेच जेरीस आणले. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी ही पिके तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा व फळबागांचे अतवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गतवर्षी पावसाने दोन्ही हंगामात ह्यखोह्ण दिल्याने समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अशातच डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. यावर्षीही पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर दीड महिन्याची दीर्घ दडी मारली. यामुळे पिके करपली व शेतकर्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे यावर्षीही पिकांची अवस्था ह्यजेमतेमह्ण असल्यामुळे शेतकर्यांचे मनोधैर्य ढळत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ातील १६ शेतकर्यांनी आत्महत्येचा पर्याय चोखाळून जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातही तालुक्यातील शेतकर्यांचा समावेश आहे.
दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या!
By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST