अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यानक पाच महिला अत्यवस्थ झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर चार महिलांना वाचविण्यात वैद्यकीय महाविद्यालयाला यश आले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान पाच महिलांची प्रकृती बिघडली होती. त्यांची प्रकृती नेमकी कोणत्या कारणांमुळे बिघडली आणि त्या महिलेचा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध अन्न व औषधी प्रशासन विभागासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधनिर्माण विभागसुद्धा घेणार आहे. यासाठी त्यांना सात सदस्यीय चौकशी समिती सहकार्य करणार आहे. १७ मार्च रोजी जिल्हा स्त्री रुग्णायलात ३२ महिलांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील पूजा गायकी, शीतल देशमुख, शालिनी टाले, जया इंगळे, सविता गेडाम या पाच महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पाचही महिलांना सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. दरम्यान, यापैकी शीतल शंकर देशमुख यांचा मृत्यू झाला. या महिलांची प्रकृती अचानक कशी बिघडली,शीतल देशमुख यांच्या मृत्यूमागील नेमके कारण कोणते, याचा शोध घेण्यात आरोग्य विभाग असर्मथ ठरला. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने शस्त्रक्रियेदरम्यान उपयोगात आणलेले इंजेक्शन, औषधे, बधिरीकरणासाठी वापरलेली सुई जप्त केली. हे सर्व साहित्य तपासणी करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील औषधनिर्माण विभागाकडे पाठविण्यात आले आहे. या दोन्ही विभागांनी साहित्याची तपासणी केल्यावरच इतर चार महिलांची प्रकृती बिघडण्यामागचे आणि शीतल देशमुख यांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल. यासंबधीचा अहवाल अन्न व औषधी विभाग व औषध निर्माण विभागाकडून येईल.
अन्न व औषधी विभागासह औषधनिर्माण विभाग घेणार मृत्यूमागील कारणांचा शोध!
By admin | Updated: March 24, 2016 02:15 IST