आकोट : आकोट-हिवरखेड राज्य मार्गावर शहरापासून जवळपास १ कि.मी. अंतरावर वाहणारी मोहाळी नदी पावसाळ्याच्या दिवसात भरभरून वाहते. या नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देत संबंधित विभागाकडून काम करून घेण्याची मागणी होत आहे.
नदीलगत नगरपरिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. गतवर्षी केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी शिरले होते. पुरामुळे कित्येक तास वाहतूक खोळंबत असल्याचा आजवरच्या अनेक पावसाळ्यातील अनुभव आहे. या नदीवरून जाण्या-येण्याकरिता पर्यायी मार्ग नसल्यामुळे पादचार्यांनासुद्धा कित्येक तास पुराचे पाणी उतरेपर्यंत वाट पाहावी लागते. वैद्यकीय उपचारासाठी व शिक्षणाकरिता येणार्यांची चांगलीच परवड होते. आकोट मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नागरिकांचीसुद्धा मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्यात पुरामुळे तासन्तास वाहतूक खोळंबण्याच्या प्रकाराने प्रचंड प्रमाणात इंधनाचा व वेळेचा अपव्यय होतो.आकोट शहर व ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आकोट-हिवरखेड मार्गावरील या पुलाची नव्याने निर्मिती करून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे आकोट सार्वजनिक बांधकाम विभागाने पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये याकरिता तातडीने नदीमध्ये वाढलेली बेशरमची झाडे तसेच नदीपात्रात साचलेला गाळ काढून खोलीकरण व सरळीकरण करणे आवश्यक आहे.
मोहाळी नदीवरील पूल बांधण्याकरिता तीन वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले; परंतु शासनाच्या बजेटमध्ये अद्याप पावेतो पुलाच्या कामाला मंजुरात मिळाली नाही, असे सा. बां. विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर होणारा त्रास लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी ही समस्या मार्गी लावावी. (तालुका प्रतिनिधी)