अकोला: स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांतून धर्म, अध्यात्म आणि शिक्षणाचा समन्वय यावर भर दिला होता. आजच्या परिस्थितीत अध्यात्म आणि शिक्षण यांच्यात समन्वय राखला जाणे गरजेचे आहे, असे मत बंगळुरु येथील एस. व्यास विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्र-कुलगुरू डॉ. के. सुब्रमण्यम यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात ह्यस्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रासंगिकताह्ण या विषयावर मंगळवारी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुब्रमण्यम बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मदनलाल खंडेलवाल होते. मंचावर अँड. दादा देशपांडे, स्वामी बुधानंद महाराज, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, समन्वयक डॉ. शिवाजी नागरे, आयोजन सचिव प्रा. डिंपल मापारी उपस्थित होत्या. पुढे बोलताना सुब्रमण्यम यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणविषयक मूल्यांचा आढावा घेतला. धर्म आणि शिक्षण यांची सांगड घालून व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना वाव दिला गेला पाहिजे, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात मदनलाल खंडेलवाल यांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन सर्वांनी विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी स्वामी बुधानंद यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील सहभागी प्राध्यापकांच्या निबंधाचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. जगदीश साबू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डिंपल मापारी यांनी दिला. संचालन डॉ. आरती देशपांडे यांनी केले. आभार डॉ. शिवाजी नागरे यांनी मानले.
अध्यात्म व शिक्षणात समन्वय हवा
By admin | Updated: January 21, 2015 01:11 IST