राजरत्न सिरसाटअकोला, दि. १८- एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर उद्भवलेल्या कृत्रिम पैसेटंचाईचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला असून, पश्चिम विदर्भात (वर्हाड) केवळ ५१ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांनी एका आदेशान्वये शेतकर्यांना २५ हजार रुपये रक्कम देण्याची सूचना बँकांना केली आहे; पण याअगोदरच वर्हाडातील हरभरा पेरणीचा हंगाम संपला आहे. गहू पेरणीही शेवटच्या टप्प्यात आहे.नोटा चलनबंदीनंतर शेतकर्यांकडे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पैसाच मिळाला नाही. ज्या शेतकर्यांनी ९ नोव्हेंबरच्या अगोदर पेरणीचे नियोजन केले होते, त्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली; पण पेरणीनंतर त्या शेतकर्यांकडेही रासायनिक खतासाठी पैसा नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वर्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी कृषी विभागीय कार्यालयाने अतिरिक्त रब्बी पिके पेरणीचे नियोजन केले होते. सरासरी क्षेत्रापेक्षा चार लाख जास्त म्हणजे ९ लाख ७४ हजार १00 हेक्टरवर रब्बीची पेरणी केली जाणार होती. प्रत्यक्षात या पाच जिल्ह्यात मूळ सरासरी क्षेत्राच्या ५१ टक्के म्हणजे २ लाख ८४ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.वर्हाडात कोरडवाहू हरभरा पीक सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी त्यासाठी अनुकूल स्थिती होती; पण पैसे आणि बियाण्यांच्या आलेल्या अडचणीमुळे केवळ २८४ हजार ८00 हेक्टरवरच शेतकर्यांना हरभरा पिकांची पेरणी करता आली. कोरडवाहू हरभरा पेरणीचा हंगाम १५ नोव्हेंबरपर्यंतच होता. गहू पिकांची पेरणीदेखील २८ हजार ८00 हेक्टरवर झाली आहे. कोरडवाहू गहू पेरणीचा हंगाम संपत आला आहे. ज्या शेतकर्यांकडे सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना डिसेंबरच्या प्रथम आठवड्यापर्यंत पेरणी करता येईल; पण पैसाच हातात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.अकोला जिल्हय़ात रब्बी पेरणीचे उद्दिष्ट १ लाख २६ हजार ६00 हेक्टर होते. प्रत्यक्षात २९,१00 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्हय़ाच्या २ लाख ५ हजार ८00 हेक्टरपैकी ७५ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली. वाशिम जिल्हय़ातील १ लाख ३0 हजार २00 हेक्टरपैकी २९,९00 हेक्टर, अमरावती जिल्हय़ातील २ लाख २९ हजार २00 पैकी ६६,८00 हेक्टर तर यवतमाळ जिल्हय़ातील २८३ हजार ३00 हेक्टरपैकी ८३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरम्यान, रब्बी ज्वारी ८,९00, मका पाच हजार हेक्टरसह इतर पिकांची तुरळक पेरणी झाली आहे.
- शेतकर्यांच्या हातात पैसाच नसल्याने विदर्भात रब्बी पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकर्यांना शेतं कोरडी ठेवावी लागली.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.- कोरडवाहू हरभरा पेरणीचा काळ संपला आहे. गहू पेरणीही अंतिम टप्प्यात आहे. ज्यांच्याकडे मुबलक सिंचनाची सोय आहे, ते या आठवड्यात गहू व हरभरा पेरणी करू शकतात.डॉ. ए.एन. पाटील,विभाग प्रमुख,कडधान्य संशोधन विभाग,डॉ.पंदेकृवि,अकोला.