निंबा फाटा : बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची लेखी तक्रार बहादुरा येथील सरपंच विठ्ठल माळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे.
सरपंच माळी हे गावातील शौचालयाची समस्या घेऊन बीडीओंकडे गेले असता समस्या ऐकून न घेता अरेरावीची भाषा वापरली व कार्यालयाबाहेर हाकलून दिले. सरपंचाला अशी वागणूक दिल्यामुळे गावातील वातावरण तापले असून, बीडीओविरुद्ध कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी गावकर्यांनी केली आहे. तक्रारीत असेही म्हटले की, देशमुख कार्यालयात नियमित हजर न राहता नेहमी दांडी मारतात. यांच्या कार्यकाळात कोणतीही विकास कामे मार्गी लागले नाही. यामुळे ग्रामीण भागात शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे. शासनाच्या योजना कार्यान्वित असतानादेखील देशमुख यांच्यासारखे अधिकारी योजनेला सुरुंग लावत आहेत. घरकुले, शौचालये, शैक्षणिक कामासाठी लाभार्थी व गावकरी या कार्यालयाभोवती घिरट्या घालत आहेत. यांच्या कार्यकाळात रोजगार हमी योजना, शेतरस्ते व फळबाग योजनेतील कामे, घरकुलांच्या कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विठ्ठल माळी यांनी दिला आहे. ग्रामविकास मंत्र्यांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असून, एक शिष्टमंडळ १८ जून रोजी मुंबईला रवाना होत आहे.