अकोला : मागील दहा दिवसांपासून विराजमान असलेल्या भाविकांच्या लाडक्या बाप्पांना आज विधीवत निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जन आगमनाप्रमाणेच धुमधडाक्यात व्हावे, यासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनानेदेखील पूर्ण तयारी केली आहे. दरवर्षी गणेशोत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. दहा दिवस संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण असते. यावर्षीदेखील भक्तीमय वातावरणाने शहर भारावून गेले होते. गणेश स्थापना २९ ऑगस्ट रोजी झाली. त्यानंतर शहरात विविध भागात मंडळांनी दहा दिवस भक्तीचा जल्लोष केला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीदेखील रेलचेल दहा दिवस अनुभवण्यास मिळाली. विविध मंडळांनी अनेक स्पर्धांचेदेखील आयोजन केले होते. मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दहा दिवसासाठी पाहुणे बनून आलेले बाप्पा आता सोमवार, ८ सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी १0 वाजता जयहिंद चौक येथून होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या बाराभाई गणपतीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर एकापाठोपाठ सार्वजनिक मंडळे मिरवणुकीने मार्गक्रमण करणार असून, गणेशघाटावर मिरवणूक संपणार आहे. मिरवणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतासोबतच गणेशघाटावर विसर्जन कुंड स्वच्छ पाण्याने भरण्यात आले आहेत. मार्गावर पथदिवे लावण्यात आले. गणेशघाटदेखील लाईट लावून सज्ज करण्यात आला आहे. मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयारी केली आहे. मूर्तींसाठी वाहने, समोर बॅन्ड, लेझीम पथम व विविध आखाड्यांचे चित्तथरारक खेळ यांचीदेखील तयारी करण्यात आली आहे. ** गणेश घाट सज्जगणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने गणेश घाट सज्ज करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराणा प्रताप बगिचा जवळील मोर्णा नदीच्या काठावर गणेश घाटाची तयारी करण्यात आली. गत आठवडाभरापासून ही तयारी सुरू आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती तसेच घरगुती गणपती मूतर्र्ींचे विसर्जन याच घाटावर करण्यात येते. त्यानुषंगाने मनपाच्यावतीने गणेश घाटाची दुरुस्ती, रंगरंगोटी करून त्यामध्ये स्वच्छ पाणी सोडण्यात आले आहे. विद्युत विभागाच्यावतीने चारही बाजूने विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या तयारीचा पाहणी आयुक्त व इतर अधिकार्यांनी रविवारी केली.** मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजरगणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व पोलिस ठाण्यांतर्गत सर्व भागातून पथसंचलन केले. पावसामुळे पोलिसांच्या गाड्या परिसरातून फिरविण्यात आल्यात. गणेश विसर्जन मिरवणुकीत जमणारी गर्दी लक्षात घेता, पोलिस प्रशासन कॅमेर्यांनी नजर ठेवण्यासोबतच मोटारसायकलींची गस्त घालणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी प्रशासनाने शहरातील जयहिंद चौक, गुलजारपुरा, ताजनापेठ चौक, सुभाष चौक, दीपक चौक आदी परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे. ** ६९ गुन्हेगार तडीपार!जुने शहर पोलिस ठाणे अंतर्गत ८, खदान पोलिस ठाणे अंतर्गत १४, रामदासपेठ पोलिस ठाणे अंतर्गत १७, सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे अंतर्गत २0, डाबकी रोड पोलिस ठाणे अंतर्गत ४ आणि आकोट फैल पोलिस ठाणे अंतर्गत ६, अशा एकूण ६९ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले. त्यामध्ये ४६ गुन्हेगारांना ३ दिवस, ६ गुन्हेगारांना २ दिवस आणि १७ गुन्हेगारांना १ दिवसाकरिता तडीपार करण्यात आले.
बाप्पाला आज निरोप
By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST