आकोट : चालू वर्षाच्या खरीप हंगामात शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीकरिता घरगुती बियाण्यांचा वापर त्याची उगवणशक्ती तपासून करावा, तसेच या बियाण्यांवर पेरणीपूर्व थायरम व रायझोबीयमची प्रक्रिया करावी, असे आवाहन आकोट उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी केले आहे.पेरणीपूर्वी शेतातील मातीची तपासणी करावी आणि पेरणी करतेवेळी रासायनिक खतांचा वापर करावा. पेरणी वेळेवर करावी. रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास ३० टक्के बियाण्यांची बचत होते. तसेच उताराला आडवी पेरणी केल्यास पाण्याचा योग्य वापर होतो. प्रत्येक वेळी फेरपालट करून आंतरपीक घेतल्याने उत्पादनात वाढ होते. सेंद्रिय तथा सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर पिकांसाठी पोषक असतो. सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा प्रयोग केल्यास पाण्याची मोठी बचत होते. शेतकर्यांनी पेरणी करताना या बाबींचा अवलंब करावाच, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन
By admin | Updated: May 10, 2014 22:04 IST