आकोट : आधीच दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या शेतकर्यांना २८ ऑक्टोबरच्या रात्री वादळ-वार्याचा तडाखा बसला. आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान झाले आहे. केळी व संत्रा मातीमोल झाला असून पर्हाटी व ज्वारीची पिके वार्याच्या वेगामुळे वाकली आहेत. लाखो रुपयांचे नैसर्गिक नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानीचा पाहणी अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात आला आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रात संत्रा व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये बहरलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा संत्रा वादळामुळे जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. बोंड्याने लदबदलेली पर्हाटीची झाडे व ज्वारीचे पीक झोपल्याने मातीमोल झाले आहे. अकोली जहॉ., रुईखेड या भागातील केळी संत्रा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात जवळपास २00 ते ३00 हेक्टरच्या वर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. काही झाडे पडली, केळीचे घड जमीनदोस्त झाले आहेत. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अकोली जहॉगीर, राजुरा, अंबाडी, कपाशी या शेतशिवारात पाहणी केली. या चार शेतशिवारात प्राथमिक अंदाजानुसार ३५ हेक्टर केळी, तर ५५ हेक्टर संत्रा बागांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.आधीच नापिकी व अनियमित पर्जन्यमानाचा फटका पिकांना सहन करावा लागत आहे. खरीप हंगामात शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी फळबागाकडे लक्ष दिले होते. परंतु, वादळाचा तडाखा फळबागांना बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. यापूर्वी १0 फेब्रुवारीच्या वादळी पावसामुळे आकोट तालुक्यात ७८0 हेक्टर केळीचे पीक व ८४0 हेक्टर संत्रा पिकाची नासाडी झाली होती.
आकोट तालुक्यात वादळाच्या तडाख्याने फळबागा भुईसपाट
By admin | Updated: October 30, 2015 01:43 IST