संतोष वानखडे / वाशिम : हिरवे स्वप्न साकारण्यासाठी नानाविध प्रयोग करणार्या शेतकर्यांना वीज वितरण कंपनीकडून ह्यशॉकह्ण बसत असल्याचे वास्तव समोर येत आहे. २0१३-१४ या वर्षात राज्यात २.२ लाख कृषीपंप विद्युतीकरणाचे उद्दिष्ट असताना, २0१४-१५ पर्यंत प्रत्यक्षात १.१५ लाख कृषीपंपाना वीज जोडणी मिळू शकली. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पादन हाती येत नसल्याने शेतकर्यांनी आधुनिक पद्धतीला जवळ केले आहे. सिंचनाशिवाय शेतमालाचे उत्पादन वाढविणे तसेच फळबाग व भाजीपालावर्गीय शेती करणे अशक्यच आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी विहिर, तलाव, शेततळे आदींच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. विहिर, तलावातून पाणी शेतात नेण्यासाठी कृषीपंपाला वीजपुरवठय़ाची जोड दिली जाते. कृषीपंपाना वीज जोडणी देण्याची जबाबदारी शासनाने महावितरण कंपनीवर सोपविली आहे. विशेष घटक योजना, रोजगार हमी योजना व शासनाच्या इतर योजनेतून कृषीपंप जोडणीचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना कृषीपंप विद्युतीकरणाचा प्राधान्यक्रमाने लाभ देण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २0१३-१४ मध्ये महावितरण कंपनीला राज्यात २.२ लाख कृषीपंपांच्या वीजजोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २0१४-१५ पर्यंत एक लाख १५ हजार कृषी पंपांना वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषीपंपांच्या विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यशासनाने २0१४-१५ मध्ये १५0 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे कृषीपंप विद्युतीकरणाची उद्दिष्टपूर्ती होणे फारशी अवघड बाब नव्हती. कृषीपंप वीजजोडणीअभावी शेतकर्यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे.
कृषीपंप वीज जोडणीचे उद्दिष्ट अध्र्यावर!
By admin | Updated: June 12, 2015 01:59 IST