अकोला- भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी गुरुवारी मुंबईत जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत अकोल्याला मात्र प्रतिनिधित्व मिळाले नाही. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर खा. दानवे यांच्याकडील मंत्रिपद काढून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या नव्या कार्यकारिणीबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता गुरुवारी संपली असली तरी अकोल्यातील भाजप नेत्यांची मात्र निराशा झाली. प्रदेश कार्यकारिणीवर सातत्याने अकोल्यातील नेत्यांची नियुक्ती होत आली आहे; दानवे पाटलांच्या ह्यटीमह्णमधून मात्र अकोला बाद झाले. यापूर्वीच्या कार्यकारिणीत डॉ. रणजित पाटील यांच्याकडे सरचिटणीसपद सोपविण्यात आले होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर पक्षसंघटनेच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात येणार, हे निश्चित होते. त्यांच्या जागी प्रदेश कार्यकारिणीत कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले होते. दानवे पाटलांनी त्यांची टीम गुरुवारी जाहीर केली तेव्हा त्यात अकोल्याला प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. अकोल्याचे शेजारी अमरावती आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांना प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले आहे. उपाध्यक्ष म्हणून आ. चैनसुख संचेती यांना कायम ठेवण्यात आले तसेच अमरावती जिल्ह्यातून नुकतेच भाजपवासी झालेले डॉ. सुनील देशमुख यांनाही उपाध्यक्षांमध्ये जागा मिळाली. अकोल्यातील ज्येष्ठ नेत्यांना मात्र प्रदेश कार्यकारिणीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
दानवेंच्या ‘टीम’मधून अकोला बाद
By admin | Updated: June 12, 2015 17:44 IST