वाशिम : चारित्र्यावर संशय घेऊन आईचा खून केल्याप्रकरणी प्रकाश किसन निखाते या आरोपी मुलास येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश वि. रा. सिकची यांनी २१ मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथे १४ डिसेंबर २0१२ रोजी पहाटे चारच्या सुमारास हे खूनप्रकरण घडले होते. प्रकाश किसन निखाते (२६) व त्याची आई रेणुकाबाई किसन निखाते (५0) हे दोघे एकत्र राहत होते. आरोपीच्या वडिलाचे निधन दहा ते बारा वर्षांपूर्वी झाले होते. रेणुकाबाई हिने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचे लग्न लावून दिले होते. त्याची पत्नी नेहमी आजारी राहत असे. शिवाय प्रकाशला दारूचे व्यसन लागल्यामुळे रेणुकाबाईने त्याच्या पत्नीस माहेरी पाठवून दिले होते. या कारणावरून तसेच आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याचा तिच्यावर राग होता. १३ डिसेंबर २0१२ रोजी रात्री रेणुकाबाई व प्रकाश दोघे घरात पलंगावर झोपी गेले. आईचा राग मनात ठेवून त्याने रात्री ३ ते ४ च्या सुमारास सुरीने गळा कापून व घरातील दगडी पाटा डोक्यावर हाणून रेणुकाबाईचा निर्घृण खून केला. सकाळी उठल्यानंतर त्याने शेजार्यांना पलंग तुटल्याने आई जखमी झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी रिसोड पोलिसांत त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२, २0१, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि. रा. सिकची यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने प्रकाशला खूनप्रकरणी जन्मठेप व एक हजार दंड तसेच पुरावा नष्ट केल्याबद्दल तीन वर्षे सक्तमजुरी व शंभर रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. अरुण सरनाईक यांनी युक्तिवाद केला.
*न्यायालयातून आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या वरच्या मजल्यावरून पोलिसांसोबत खाली येत असताना आरोपी प्रकाशने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे काही आरोपींना न्यायालयात नेत होते. आरोपी पळत असल्याचे दिसताच त्यांनी पाठलाग करून कोशागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ३.१५ वाजता प्रकाशला पकडले.