अकोला: जिल्ह्यातील ९२७ गावांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी सातत्याने खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जिल्ह्यातील सर्वच गावांना दुष्काळग्रस्त मदत देण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांपैकी केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी सरासरी २ पैसे असतानासुद्धा अकोला जिल्ह्यावर अन्याय होत होता. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तगादा लावून शेतकर्यांच्या व्यथा मांडल्यात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून या गावांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याला न्याय दिला असल्याची भावना आ. सावरकर यांनी व्यक्त केली. शासनाने याच पद्धतीने सिंचन प्रकल्पांसाठी व अनुशेष भरण्यासाठी पश्चिम विदर्भाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. सावरकर यांनी व्यक्त केली.
अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही मिळणार दुष्काळी मदत!
By admin | Updated: March 28, 2016 01:31 IST