मिरजगाव : अलिकडे झालेल्या पावसामुळे सीना धरणात गेल्या चार वर्षानंतर समाधानकारक पाणीसाठा आहे. या पाण्यामुळे पाणी योजनांना जीवदान मिळेलच शिवाय धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून उन्हाळ्यात आवर्तन मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.सीना धरणात गेल्या पंधरा दिवसांपासून कुकडी व सीना नदीच्या उगमस्थानात पडणाऱ्या पावसामुळे तब्बल चार वर्षानंतर समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रविवारी सीना धरणात १४२९.९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. २१ आॅगस्टपासून भोसेखिंडीतून ९ सप्टेंबरपर्यंत कुकडीचे आवर्तन ४०० क्युसेसने सीना धरणात सोडण्यात आले. या वीस दिवसांच्या आवर्तनात ३५७.०० दशलक्षघनफूट पाणीसाठा झाला. त्यानंतर सीना धरणाच्या उगमस्थानामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. सीना धरण परिसरात जून २०१४ ते आजअखेर ५०७.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. जून,जुलै हे दोन महिने कोरडे गेल्याने खरीप हंगामही साधला नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र उत्तरा नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर रब्बीच्या पेरण्या झाल्या. धरणात चांगला पाणीसाठा असल्याने मिरजगाव पाणी पुरवठा, निमगाव गांगर्डा पाणी योजना या योजनांना जीवदान मिळाले. तसेच सीनाच्या उजव्या व डाव्या कालव्यात उन्हाळ्यात शेतीसाठी आवर्तन मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. (वार्ताहर)
सीना धरणामुळे पाणी योजनांना जीवदान
By admin | Published: September 21, 2014 11:45 PM